चिखली (उद्धव पाटील-बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाणारे चिखली शहर सध्या प्रशासनाच्या अनास्थेमुळे गंभीर अडचणीत सापडले आहे. चिखली नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून तीन वर्षांचा कालावधी लोटला असून, त्यानंतर प्रशासकीय कारभार ढासळलेला दिसून येत आहे.
शहरातील घंटागाडी सेवा ही अक्षरशः औपचारिक राहिलेली असून, आठ आठ दिवस ही सेवा बंद राहत आहे. परिणामी नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असून, बुलढाणा रोडवरील नदीपात्रात साचणाऱ्या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्येला आमंत्रण मिळत आहे. पाणी शुद्धीकरण व्यवस्थेची अवस्था तर विचारण्याच्या पलीकडे गेली आहे. शहरातील रस्त्यांवर गुरांचा मुक्त संचार वाढलेला असून, त्यामुळे वाहतुकीला वारंवार अडथळे निर्माण होत आहेत.
याबाबत पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. चिखलीतील एस.टी. बसस्थानक परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात नेहमीच वाहने रस्त्यावर उभी असतात. यामुळे आशीर्वाद मेडिकल आणि पुतळ्याजवळचा रस्ता दररोज जाम होतो.
यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न केल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे.चिखलीकरांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले असून, नगरपालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याने शहराचा कारभार ठप्प झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून व्यवस्था सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.