बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — तालुक्यातील एका गावात काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या सतर्कतेमुळे थांबविण्यात आलेला बालविवाह पुन्हा चर्चेत आला आहे. कारण, संबंधित अल्पवयीन मुलगी ६ जून रोजी रात्री ११.३० वाजता घरातून पळून गेली आहे. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचे लग्न तिच्या पालकांनी एका मुलासोबत ठरवले होते. साखरपुडा देखील झाला होता आणि ५ मे रोजी विवाह पार पडणार होता. मात्र गावातील जागरूक नागरिकांनी १०९८ या बालहक्क हेल्पलाईनवर तक्रार करताच पोलिसांनी हस्तक्षेप करून लग्न थांबवले.
त्यानंतर मुलीच्या पालकांनी ठरवले होते की, ती १८ वर्षांची झाल्यावरच तिचा विवाह करतील.मात्र ६ जून रोजी रात्री घरातील सर्वजण झोपले असताना मुलगी एका अज्ञात युवकासोबत पळून गेली. कळताच दुसऱ्या दिवशी सकाळी पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात युवकाविरोधात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.