लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे गाजावाजा करून आश्वासन शेतकऱ्यांना दिले. मात्र, आता सत्ता मिळाल्यानंतर तीन महिने उलटले तरीही सरकारकडून कर्जमाफीचा कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केला आहे.
आज (११ एप्रिल) सहदेव लाड यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी लोणार तहसील कार्यालयावर टाळ-मृदंगांच्या गजरात ‘कर्जमाफी वारी’ काढली. वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. या वारीमुळे संपूर्ण लोणार शहर दणाणून गेले होते.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजबिल माफी, हमीभावासह विविध मागण्यांसाठी हा आंदोलनात्मक इशारा देण्यात आला. यावेळी बोलताना सहदेव लाड म्हणाले, “राज्य सरकारने शेतकऱ्यांना आश्वासने देऊन मतं घेतली. मात्र आता कर्जमाफीच्या वेळी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. काही मंत्री तर शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य करत आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे.”
Guptadhan: गुप्तधनासाठी काळी जादू? रोहडा-गांगलगाव रस्त्यावरील ओसाड गावात संशयास्पद खड्डा…
तसेच, “सरकारने येत्या २६ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर न केल्यास, लोणार तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा लाड यांनी यावेळी दिला.
या आंदोलनामुळे प्रशासनही काहीसे गोंधळलेले दिसले. आंदोलकांनी निवेदनाद्वारे आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविल्या असून, आता सरकारने गंभीरपणे विचार करावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.