शेतकऱ्यांचा एल्गार: रविकांत तुपकरांचा बँकांना इशारा, केंद्रीय मंत्र्यांवर टीका

सिंदखेड राजा (सचिन खंडारे- बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील संत सावता महाराज मंदिराच्या सभागृहात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत ‘शेतकऱ्यांचा एल्गार’ सभा उत्साहात पार पडली. पावसाळ्याच्या मशागतीच्या हंगामातही शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या सभेत तुपकर यांनी बँकांना कडक इशारा देत शेतकऱ्यांचे अनुदान कर्जखात्यात जमा केल्यास शाखा व्यवस्थापकांना धडा शिकवण्याची घोषणा केली. तसेच, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.

सभेची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ माँ यांच्या प्रतिमेला अभिवादनाने झाली. यानंतर विविध जिल्ह्यांतून आलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. यामध्ये स्थानिक शेतकरी नेते कैलास मेहेत्रे, बाळू शेवाळे, गजानन चव्हाण, पंढरपूरचे राजाराम जाधव, भोकरदनचे आदिनाथ वानखेडे, छत्रपती संभाजीनगरचे शिवहरी वाघ, नांदेडचे लक्ष्मणजी मोरे, तसेच स्वाभिमानी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, ॲड. शर्वरी तुपकर, युवा प्रदेशाध्यक्ष कसबे (लातूर), ॲड. अश्विनी मेहेत्रे आणि सहदेव लाड यांनी मनोगत व्यक्त केले.

तुपकरांचा विरोधकांवर हल्लाबोल

रविकांत तुपकर यांनी सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. “काही लोकांना रविकांत तुपकर बनायचंय, पण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही,” असा टोला त्यांनी लगावला. नुकत्याच सिंदखेड राजा येथे काढलेल्या मोर्चात काही नेत्यांनी तुपकरांवर टीका केली होती की, त्यांनी कार्यकर्त्यांना मोर्चाला जाऊ नका, असा फोन केला. यावर तुपकर म्हणाले, “आईची शपथ, मला असे धंदे येत नाहीत. मला फोन करायलाही वेळ नाही. घरच्यांशी चार-पाच दिवस संवाद होत नाही, मग मी कोणाला फोन करणार?” गेल्या २२ वर्षांच्या संघर्षातून आपण इथपर्यंत पोहोचल्याचे सांगत, त्यांनी विरोधकांना आव्हान दिले, “तुम्हीही शेतकऱ्यांसाठी लढा, आम्हाला आक्षेप नाही.”

तुपकरांनी आपली प्रामाणिकता अधोरेखित करताना सांगितले की, त्यांनी कोणाचीही फसवणूक केलेली नाही. “बुलडाणा जिल्ह्यातील लोकांचे प्रेम माझ्या पाठीशी आहे. वाशी फाट्याजवळ माझा अपघात झाला, पण लोकांच्या प्रेमामुळे मला काहीच झालं नाही,” असे ते म्हणाले. उबाठा गटाच्या ट्रॅक्टर मोर्च्यावेळी एका नेत्याने तुपकरांमुळे त्यांचा उमेदवार पडल्याचा आरोप केला होता. यावर तुपकरांनी प्रत्युत्तर दिले, “उबाठा गटाच्या उमेदवारामुळेच मी पडलो. जर वयस्कर नेत्यांनी जोर लावला असता, तर चित्र वेगळे असते.”

केंद्रीय मंत्र्यांवर टीकास्त्र

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर तुपकरांनी जोरदार हल्ला चढवला. “जाधव पंतप्रधानांच्या मांडीला मांडी लावून बसतात, पण त्यांनी कधी पीक विमा किंवा कर्जमाफीबाबत निवेदन दिलं का? त्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्रात बोलावं, कार्यकर्त्यांना तडीपार करण्यासाठी ताकद वाया घालू नये,” असे तुपकर म्हणाले. “केंद्रीय मंत्री झाले तरी जिल्ह्यासाठी काय केलं? पंतप्रधान झाले तरी शेतकऱ्यांचा काय फायदा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बँकांना कडक इशारा

शेतकऱ्यांचे पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, ठिबक अनुदान आणि शेतमाल विक्रीचे पैसे बँकांनी परस्पर कर्जखात्यात जमा केल्यास कठोर कारवाईचा इशारा तुपकरांनी दिला. “जिल्ह्यातील कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांचे अनुदान कर्जखात्यात जमा केले, तर शाखा व्यवस्थापकाला चोप देऊ,” असे त्यांनी ठणकावले. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्ट्रीयकृत बँकांना समज देण्याची मागणी केली. “बँकांनी असेच प्रकार केले, तर शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचतील. शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत,” असे ते म्हणाले.

महायुती सरकारवर टीका, शेतकऱ्यांचा लढा सुरूच

तुपकरांनी महायुती सरकारवरही निशाणा साधला. “संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांची वज्रमूठ तयार करू. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी आणि पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढू,” अशी गर्जना त्यांनी केली. शेडनेट धारकांना पीक विमा लागू व्हावा, यासाठी मंत्रिमंडळात स्वतंत्र बैठक घेण्याची मागणीही त्यांनी लावून धरली. विदर्भातील दौऱ्याची सुरुवात सिंदखेड राजा येथून करताना, तुपकरांनी सांगितले की, क्रांतिकारी शेतकरी संघटना २५ जिल्ह्यांमध्ये ताकद उभी करत आहे. “कोणत्याही दारात मदत मागण्याची गरज नाही. कोणतेही काम सांगा, मी करायला तयार आहे,” असे त्यांनी ठणकावले.

पीक विमा कंपनीलाही इशारा

“जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत मुंबईतील कार्यालयात ठिय्या मांडू,” असे तुपकरांनी पीक विमा कंपनीला बजावले. जून महिन्यात शेतकऱ्यांना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असे सांगत त्यांनी आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. पीक विम्याच्या पावत्या जिल्हा कृषी अधीक्षकांकडे सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सभेचे सूत्रसंचालन विनायक पाटील भानुसे यांनी केले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. विशेष म्हणजे, या सभेला महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना अखंड लढा देणार असल्याचे तुपकरांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “शेतकऱ्यांचा एल्गार: रविकांत तुपकरांचा बँकांना इशारा, केंद्रीय मंत्र्यांवर टीका”

Leave a Comment

WhatsApp Join Group!