लोणार, (दिपक कायंदे- बुलडाणा कव्हरेज न्युज): येवती ग्रामपंचायतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सरपंच प्रयागबाई अर्जुन पाटोळे यांच्याविरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव २० जून २०२५ रोजी झालेल्या विशेष सभेत बहुमताने मंजूर झाला. ग्रामपंचायतीच्या एकूण ९ सदस्यांपैकी ८ सदस्यांनी या ठरावाला पाठिंबा दर्शवला, ज्यामुळे सरपंचांचे पद आता धोक्यात आले आहे.
या ठरावात सरपंचांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये स्वेच्छाचाराने निर्णय घेणे, निधी वाटपात अनियमितता, ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी नीट न करणे, मासिक ग्रामसभांचे आयोजन न करणे आणि प्रशासनात पारदर्शकतेचा अभाव अशा तक्रारींचा समावेश आहे. ठरावावर उपसरपंच रामेश्वर कायंदे यांच्यासह अनिता वाघ, रामेश्वर सानप, मंदाबाई सानप, नारायण कायंदे, प्रिया खरात, लता खरात आणि रेणुका डोईफोडे यांनी सह्या केल्या आहेत.
अंचरवाडी येथे २३ जूनला महाआरोग्य शिबिराचे आयोजन आ. मनोजभाऊ कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम…
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार, थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाविरोधातील अविश्वास ठरावासाठी तीन-चतुर्थांश बहुमत आवश्यक आहे. येवती ग्रामपंचायतीत ८ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मत दिल्याने हा निकष पूर्ण झाला आहे. तरीही, सरपंच थेट जनतेने निवडले असल्याने, अंतिम निर्णय बुलढाणा जिल्हाधिकारी घेतील. पुढील टप्प्यात विशेष ग्रामसभा आयोजित होईल, जिथे गुप्त मतदानाद्वारे सरपंचांना जनतेचा विश्वास मिळवावा लागेल. या सभेच्या निकालावरच त्यांच्या पदाचे भवितव्य अवलंबून आहे.
या घडामोडींमुळे येवती गावात तीव्र राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. गावकरी आणि स्थानिक राजकीय वर्तुळात या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. प्रयागबाई पाटोळे यांना आपले पद वाचवण्यासाठी जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करावा लागेल, अन्यथा ग्रामपंचायतीत नवीन नेतृत्व उदयास येऊ शकते.
2 thoughts on “थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचा विरोधात अविश्वास ठराव मंजूर: येवती ग्रामपंचायतीत राजकीय वादळ!”