Advertisement Advertisement

स्व. कैलास नागरे यांच्या पत्नीचे निवेदना द्वारे प्रशासनाला बारा दिवसाचा अल्टिमेट अन्यथा अन्नत्याग आंदोलन…

स्व. कैलास नागरे यांच्या पत्नीचे निवेदना द्वारे प्रशासनाला बारा दिवसाचा अल्टिमेट अन्यथा अन्नत्याग आंदोलन…

बुलढाणा (कैलास आंधळेबुलडाणा कव्हरेज न्यूज): स्वर्गीय कैलास अर्जुन नागरे, ज्यांना महाराष्ट्र शासनाने युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले होते, यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी १३ मार्च २०२५ रोजी आपले जीवन बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानाला चार महिने उलटूनही त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. याच पार्श्वभूमीवर, त्यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी सिंदखेड राजा तहसील कार्यालयात निवेदन सादर करून राज्य सरकारला १२ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर या कालावधीत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आणि त्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली नाही, तर त्या २१ जुलै २०२५ पासून शिवणी अरमाळ येथील आपल्या राहत्या घरी अन्नत्याग आंदोलन सुरू करतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

डॉक्टरने स्वतःला भर रस्त्यात पेटवून घेतले, प्रकृती गंभीर; नांदुरा-जळगाव जामोद रस्त्यावरील घटना, व्हिडिओ वायरल

स्वाती नागरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. कैलास नागरे यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये त्यांच्या मुलांचे आणि कुटुंबाचे पालकत्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे, अशी विनंती केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली होती. परंतु, या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. “मुख्यमंत्र्यांनी आमच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले आहे, पण त्यानंतर काय झाले, याची कोणतीही माहिती आम्हाला मिळालेली नाही. म्हणूनच मी १२ दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करू इच्छिते,” असे स्वाती नागरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

तुकडेबंदी कायदा रद्द करणार: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, महसूलमंत्र्यांची मोठी घोषणा

कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळावे, यासाठी सातत्याने आंदोलने केली होती. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी सात दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने निराश होऊन त्यांनी १३ मार्च २०२५ रोजी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. विशेष म्हणजे, स्व. कैलास नागरे यांना ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्य सरकारने युवा शेतकरी पुरस्काराने गौरवले होते.

स्वाती नागरे यांनी आपल्या निवेदनात प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “माझ्या पतीच्या बलिदानानंतर अनेक राजकीय पक्षांचे नेते, पालकमंत्री, सामाजिक आणि शेतकरी संघटनांनी भेटी दिल्या. सर्वांनी मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि कुटुंबाच्या काळजीची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले. पण एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. प्रशासनाने माझ्या पतीच्या आंदोलनाची आणि निवेदनाची वेळीच दखल घेतली असती, तर ही वेळ माझ्यावर आणि माझ्या मुलांवर आली नसती,” असे त्या म्हणाल्या.

गाव गाड्याच्या राजकारणात सामान्य गावकऱ्यांची कुचंबना, सामाजिक फूट आणि रखडलेली प्रगती; फुटीच्या राजकारणाला मूठमाती देण्याची गरज?

स्वाती नागरे यांनी पुढे सवाल उपस्थित केला की, “जर माझ्या पतीच्या बलिदानानंतरच धरणावरील झाडं-झुडपं काढण्याची कामे झाली, तर मला आणि माझ्या मुलांना न्याय मिळवण्यासाठीही अन्नत्याग आंदोलन करावे लागेल का? जर बलिदान देऊनच न्याय मिळत असेल, तर मीही त्या प्रक्रियेला सामोरे जायला तयार आहे. पण त्याची सर्व जबाबदारी राज्य सरकारची असेल.” त्यांनी सध्याचे विधानसभा अधिवेशन चालू असताना सरकारने मुलांच्या शिक्षणाची आणि पालकत्वाची जबाबदारी अधिवेशनात मांडावी आणि तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

स्वाती नागरे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, जर १२ दिवसांच्या आत त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही, तर त्या २१ जुलै २०२५ पासून शिवणी अरमाळ येथे स्वर्गीय कैलास नागरे यांच्या प्रतिमेसमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करतील. “माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी लढत आहे. सरकारने माझ्यावर पुन्हा बलिदानाची वेळ आणू नये,” असे त्यांनी ठणकावले.

कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या बहिणी सत्यभामा नागरे यांनीही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि स्थानिक आमदार सुनील कायंदे यांना खडेबोल सुनावले होते. त्यांनी कैलास यांच्या मृत्यूला आत्महत्या नसून शेतकऱ्यांसाठी बलिदान म्हटले होते. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी खडकपूर्णा धरणाच्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

स्वाती नागरे यांच्या या अल्टिमेटममुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी समुदायात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाकडे सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष हे या दुखद घटनेचे मूळ कारण असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे मत आहे. आता सरकार स्वाती नागरे यांच्या मागण्यांना कशा प्रकारे प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “स्व. कैलास नागरे यांच्या पत्नीचे निवेदना द्वारे प्रशासनाला बारा दिवसाचा अल्टिमेट अन्यथा अन्नत्याग आंदोलन…”

Leave a Comment

WhatsApp Join Group!