चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील भालगाव येथील शेतकरी हतबल झाले आहेत. शेताकडे जाणारा त्यांचा वडिलोपार्जित रस्ता बंद झाल्याने त्यांची शेती पडीत पडली आहे. पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वैतागलेल्या या शेतकऱ्यांनी आता थेट सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. जर ८ जुलैपर्यंत रस्ता खुला झाला नाही, तर ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चिखली तहसील कार्यालय किंवा मुंबईतील विधानभवनासमोर विष प्राशन, आत्मदहन किंवा गळफास घेऊन जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.
भालगाव शिवारातील सर्वे नंबर ६० अंतर्गत गट नंबर १७०, १७१, १७२, १७३ आणि १७८ मधील सुमारे ४ हेक्टर १० आर जमीन असलेल्या शेतकऱ्यांची शेती सध्या गवताने भरली आहे. शेजारील शेतांमध्ये सोयाबीन, कापूस लहलहत असताना, या शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही. कारण, त्यांचा शेताकडे जाणारा वडिलोपार्जित रस्ता काही व्यक्तींनी अडवला आहे. शेतकऱ्यांचा दावा आहे की, हा रस्ता त्यांनी वर्षानुवर्षे वापरला, पण आता तो जाणीवपूर्वक बंद करण्यात आला आहे.
‘त्या’ वृद्ध शेतकरी दाम्पत्यासाठी तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना सरसावली..!
या समस्येसाठी शेतकऱ्यांनी १२ मार्च २०२३ रोजी तहसीलदारांकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर २० जून २०२५ रोजी तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. पण १ जुलै २०२५ रोजी नायब तहसीलदारांनी फक्त कागदोपत्री पंचनामा केला, प्रत्यक्षात रस्ता मोकळा झाला नाही. शेतकऱ्यांनी पुन्हा शेतात जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना प्रतिवादींकडून शिवीगाळ आणि धमक्या मिळाल्या. गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तिथे असतानाही अडवणूक करणाऱ्यांनी कोणालाही जुमानले नाही.
संतापजनक: मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण, दोन आरोपी अटकेत
शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, २२ मे २०२५ च्या शासकीय आदेशानुसार शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा कायदेशीर हक्क आहे. पण प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हा आदेश प्रत्यक्षात लागू होत नाही. “आम्ही काय खावं? मुलांना कसं सांभाळावं? आता मरणाशिवाय पर्याय नाही,” अशी वेदना त्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला ८ जुलैपर्यंत रस्ता खुला करण्याची शेवटची मुदत दिली आहे. तसे न झाल्यास ९ जुलै रोजी ते जिल्हाधिकारी कार्यालय, चिखली तहसील कार्यालय किंवा मुंबई विधानभवनासमोर सामूहिक आत्महत्या करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. या निवेदनावर रमेश चत्तरसिंह परिहार, चंद्रपाल भिकाजी परिहार, विश्वनाथ गुलाबराव परिहार, गजानन एकनाथ परिहार आणि आंबादास तुळसिंग परिहार यांच्या सह्या आहेत.
“रस्ता बंद झाल्याने आमची शेती ठप्प आहे. पोटापाण्याचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासनाने आदेश दिले, पण अंमलबजावणी होत नाही. आता जगण्याची आशाच संपली आहे,” असे शेतकऱ्यांनी सांगितले. ही केवळ उपजीविकेची लढाई नसून, त्यांच्या हक्क आणि अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे.
3 thoughts on ““आम्ही काय खावं? मुलांना कसं सांभाळावं? आता मरणाशिवाय पर्याय नाही”: भालगावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा!”