बुलडाणा (उद्धव पाटील- बुलडाणा कव्हरेज न्युज): “तुम्हीच सांगा साहेब, संतोष भुतेकर च चुकलं कुठ??” असा थेट सवाल सध्या सुलतापूर, चिचखेड आणि मंडपगाव परिसरातील नागरिक विचारत आहेत. कारण नेहमीप्रमाणे संतोष भुतेकर प्रशासनाला त्रास देण्यासाठी नाही, तर समाजात घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतोय. त्याला जे दिसतं, जे सहन होत नाही – तेच तो बोलतोय. यावेळी मुद्दा आहे, आपल्या मुलांच्या शिक्षणाचा… त्यांच्या सुरक्षिततेचा!
रोजचा त्रास आणि धोकादायक प्रवास!
स्व. भास्करराव विद्यालय, गारवा ढाब्याजवळ येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सुलतापूर, चिचखेड आणि मंडपगाव येथून यावे लागते. मात्र, त्यांच्या शिक्षणाचा रस्ता वाळूमाफियांनी अक्षरशः अडवून टाकला आहे. शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या टिप्पर वाहनांचा सततचा वावर, मध्येच तुंबलेली गटारे, खड्डे, गाळ आणि पाण्याने भरलेले रस्ते – या सर्व गोष्टींमुळे मुलांना शाळेत पोहचणं म्हणजे एक जीवघेणं संकट बनलं आहे.
चिखली बायपासजवळ २१ गुरांची अमानुष वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल
“टिप्परवर बंदी घाला!”
ज्या रस्त्याने विद्यार्थी शाळेत जातात, त्या मार्गावरून टिप्पर वाहतूक तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी आणि तो विद्यार्थ्यांना व नागरिकांना वापरण्यास योग्य करावा, ही मागणी संतोष भुतेकर यांनी प्रशासनासमोर ठेवली आहे. याचबरोबर अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी, अशीही नागरिकांची भावना आहे.
कायद्याचे खुलेआम उल्लंघन!
चिखली तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पाजवळून रात्री-अपरात्री रेतीचा अवैध उपसा करून टिप्परद्वारे वाहतूक केली जाते. या माफियांना स्थानिक राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यामुळेच अनेकदा प्रशासनही यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करते. परिणामी, अवैध रेती वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक भरलेले टिप्पर आणि बेधुंद वेगाने धावणारी ही वाहनं – सामान्य नागरिकांच्या जीवावर उठली आहेत.
राजकीय वरदहस्त… प्रशासनाची सुस्ती!
हा रस्ता केवळ शाळकरी मुलांचाच नाही, तर रोजच्या गरजा भागवणाऱ्या स्थानिकांचा जीवनमार्ग आहे. पण दुर्दैवाने, रस्ता आज ‘अपघातांचा मार्ग’ बनला आहे. पायवाटच शिल्लक राहिलेली नाही. किरकोळ अपघात रोज घडत आहेत. कधी तरी मोठा जीवघेणा अपघात होण्याआधी प्रशासनाने जागं व्हावं, हीच अपेक्षा आहे.
“संतोष भुतेकर बोलतोय कारण तो झोपलेला नाही!”
प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही, आंदोलन करूनही, माध्यमांतून आवाज उठवूनही जर काहीच बदल होत नसेल, तर कोणीतरी तरी बोललं पाहिजे ना? आणि तो आवाज म्हणजेच संतोष भुतेकर. त्यामुळे आता प्रश्न प्रशासनालाच विचारला जातोय – “संतोष भुतेकर चुकलय कुठं?”