बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): “शेतकऱ्यांना मदत देता येत नसेल तर किमान, त्यांच्या जखमेवर तरी मीठ तरी चोळू नका,” अशा शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महायुती सरकारमधील मंत्र्यांना खडसावले आहे. “आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असं समजू नका.यापुढे अतिरेक झाला, तर जशास तसे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत,” असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला.
रविकांत तुपकर हे गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र दौऱ्यावर असून, “उर्वरित शेतकऱ्यांना पिकविमा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, आणि पिक कर्ज त्वरित वाटप झालं पाहिजे”, यासह अनेक मागण्या घेऊन ते राज्यभर एल्गार सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला शेतकऱ्यांचा व तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.
दरम्यान, राज्याचे कृषी मंत्री यांनी “आता काय ढेकळाचे पंचनामे करायचे का?” असे अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले. या विधानाने शेतकऱ्यांच्या भावनांवर घाव बसला असून, तुपकरांनी या विधानाचा तीव्र निषेध करीत कृषी मंत्र्यांचा कडक समाचार घेतला आहे.
“शेतकऱ्याच्या वेदना समजून घेण्याऐवजी त्यांना हिणवण्याचं काम सरकार करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, तर याची जबाबदारी सरकारची असेल,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
“शेतकऱ्यांसाठी लढणं ही आमची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आम्ही कोणत्याही परिस्थितीत निभावणार,” अशी ठाम भूमिका घेत त्यांनी पुन्हा एकदा सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
1 thought on “शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल तर किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका! वाचाळवीर मंत्र्यांना आवरा, नाहीतर जशास तसे उत्तर देऊ – रविकांत तुपकर यांचा कडक इशारा..”