बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज ): क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या अत्यंत जवळचे, कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांना पक्षाच्या राज्य कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे. एवढेच नाही तर जिल्हा कार्यकारिणीमधून सुद्धा त्यांना बाजूला ठेवण्यात आले असून, सध्या त्यांच्याकडे कोणतेही पक्षपद नाही.
विनायक सरनाईक हे नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे कार्यकर्ते आहेत. अनेक आंदोलने, उपोषण, रस्ता रोकोमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. नितीन राजपूत देखील तळमळीने कार्य करणारे तरुण नेते म्हणून ओळखले जातात. अशा नेत्यांना पक्षातून दूर ठेवण्याचा निर्णय का घेतला गेला, यावर अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
वळती ग्रामपंचायतीत आर्थिक गोंधळ? हजारांचे काम, लाखोंची बिले! अन माहिती देण्यास टाळाटाळ…
मागील दोन महिन्या अगोदर बुलडाण्यात जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर थेट पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या दोन्ही बैठकींमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सरनाईक आणि राजपूत यांना पदांपासून दूर ठेवण्यामागचं नेमकं कारण पक्षाने स्पष्ट केलेले नाही.
चिखली तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी घरदार न पाहता, अक्षरशः पायाला भिंगरी लावून मतदारांमध्ये प्रचार केला होता. त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी थेट मुकाबला करून, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मोठ्या प्रमाणात मते मिळवून दिली होती.
एकच श्वास… एकच शेवट – डोड्रा गावातल्या परिहार दाम्पत्याचा हृदयस्पर्शी आणि मनाला चटका लावणारा अंत…
मग इतक्या मेहनतीनंतर त्यांना पक्षाने का डावलले? कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा हा मोबदला आहे का? असे प्रश्न सध्या तालुक्यातील जनतेत विचारले जात आहेत.
राजकीय डावपेच, अंतर्गत नाराजी की रणनीतीचा भाग?
या निर्णयामागे पक्षातील अंतर्गत गटबाजी, वैयक्तिक मतभेद की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रचलेली रणनीती – हे स्पष्ट होणे बाकी आहे. मात्र, सरनाईक आणि राजपूत यांना पक्षातील कोणतेही पद न देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना नाराजीचे कारण वाटत आहे.
सध्या हे दोन्ही कार्यकर्ते शांत आहेत, पण त्यांचा पुढील निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुपकर यांच्या मनात काय ?
विनायक सरनाईक आणि नितिन राजपुत यांनी रविकांत तुपकर यांच्यासोबत कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता शेतकरी प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलने केली. रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यासोबत फारकत घेतल्यानंतर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून दूर झाल्यानंतरही सरनाईक आणि राजपुत यांनी तुपकरांना साथ दिली. पदाची अपेक्षा नसतानाही त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. क्रांतीकारी शेतकरी संघटना त्यांचे योगदान वाया जाऊ देणार नाही, अशी त्यांची अपेक्षा असू शकते. मात्र, तुपकर यांच्या मनात काय आहे, हे स्पष्ट करणे कठीण आहे.