बुलडाणा, (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारकडून होणारं दुर्लक्ष आणि निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज बुलडाणा जिल्हा मुख्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा (Buldhana Tractor Morcha) काढण्यात आला. शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो शेतकऱ्यांच्या सहभागाने हा मोर्चा लक्षवेधी ठरला. यामुळे शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शेतकऱ्यांमधील वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाने सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
मोर्चाची सुरुवात आणि सभा
जिजामाता प्रेक्षागृह परिसरातून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. टिळक नाट्य क्रीडा मंदिराजवळील मैदानात दुपारच्या रणरणत्या उन्हात सभा पार पडली. या सभेत शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. यानंतर मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. तिथे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.

नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
मोर्चादरम्यान शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत आणि आमदार सिद्धार्थ खरात यांनी आक्रमक भाषणं करत सरकारला धारेवर धरलं.
नरेंद्र खेडेकर यांनी सभेत सांगितलं, “भारत हा कृषिप्रधान देश आहे, पण सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं. उद्योगपतींची कर्जं माफ होऊ शकतात, मग शेतकऱ्यांची का नाहीत? पिकविमा योजनेत शेतकऱ्यांना १५०-२०० रुपये मिळतात, ही तर शेतकऱ्यांची थट्टा आहे!” त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरही निशाणा साधला. “खरं भूमिपुत्र बनायचं असेल तर फक्त इलेक्ट्रिक गाडीत फिरून चालत नाही, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात,” असा टोला त्यांनी लगावला.
जालिंदर बुधवंत यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं. “शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. निवडणुकीत आश्वासनं देऊन सत्ता मिळवली, पण आता ती पूर्ण होत नाहीत. पुढे विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सळो की पळो करू. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या या सरकारला आंदोलनाचा उद्रेक सहन करावा लागेल!” असा इशारा त्यांनी दिला.
आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवला. “आम्ही विरोधी पक्षात असलो तरी फडणवीसांपेक्षा भारी आहोत. महायुतीतील एकही आमदार शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलेला नाही. नाफेडच्या खरेदी केंद्रांबाबतही सरकार उदासीन आहे. हे सरकार फक्त बोल बच्चन आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे, पण सरकारला त्याची पर्वा नाही,” असं ते म्हणाले.
ॲड. जयश्री शेळके यांनी शेतकऱ्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करताना म्हटलं, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा आहे. सरकारला जाग येण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं. हा मोर्चा म्हणजे फक्त सुरुवात आहे, पुढेही आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू.”

Buldhana Tractor Morcha: शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
मोर्चादरम्यान शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या:
- पूर्ण कर्जमाफी: शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी मिळावी.
- पिकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी: शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी.
- शेतमालाला हमीभाव: सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना किफायतशीर दर मिळावा.
- नाफेड केंद्रांची संख्या वाढवा: खरेदी केंद्रांची संख्या आणि कार्यक्षमता वाढवावी.
- पाणी आणि वीज पुरवठा: शेतीसाठी नियमित वीज आणि पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी.
या मोर्चात बुलडाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शिवसेनेने या आंदोलनातून स्पष्ट संदेश दिला की, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत त्यांचा लढा सुरू राहील. सरकारला जबाबदारी स्वीकारावी लागेल, अन्यथा भविष्यात यापेक्षा तीव्र आंदोलनं होतील, असा इशाराही देण्यात आला.
या मोर्चामुळे बुलडाणा शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण होतं, पण पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाने स्थानिक राजकारणातही खळबळ उडाली आहे.