मेहकर (सतीश काळे– बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर तालुक्यातील चायगाव गावात बुधवारी (ता. १४ मे २०२५) दुपारी अवकाळी पावसाने थैमान घातले. यावेळी वीज पडून ७५ वर्षीय शेतकरी अर्जुन कुंडलिक रोही यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चायगाव येथील अर्जुन रोही हे बुधवारी दुपारी आपल्या शेतात काम करत होते. अचानक आकाशात ढग दाटून आले आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी जवळच्या झाडाखाली आश्रय घेतला. मात्र, काही क्षणांतच त्या झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत अर्जुन रोही गंभीररित्या जखमी झाले.
सुलतानपूर येथील आठवडी बाजारातील किरकोळ वादामुळे गावात तणाव; पोलिसांनी आणली परिस्थिती नियंत्रणात
स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने त्यांना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेने रोही कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अर्जुन यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर चायगाव गावात शोककळा पसरली आहे. अर्जुन रोही हे गावातील एक प्रामाणिक आणि मेहनती शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकस्मात निधनाने गावकऱ्यांना धक्का बसला आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडून तात्काळ आर्थिक मदत आणि पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
2 thoughts on “मेहकर तालुक्यातील चायगाव येथे वीज पडून ७५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू: अवकाळी पावसाचा तडाखा!”