“घटस्फोट” मानवी समाजातील कोण्या एका विसंवादी जोडप्यास अनावृत्त पञ…कवी नंदी!

"घटस्फोट" मानवी समाजातील कोण्या एका विसंवादी जोडप्यास अनावृत्त पञ...!

संपादकीय: मानवी समाजातील कोण्या एका विसंवादी जोडप्यास अनावृत्त पत्र लिहण्यास कारण की चार भिंतीतील भांडण चव्हाट्यावर आलं की समाजातील काही विघ्नसंतोषी लोकांना बरं वाटतं. तसं वाटणंही साहजिकच आहे. मानवी स्वभाव मुळातच “स्वतःच ठेवावं झाकून, दुसऱ्याच पहावं वाकून” या प्रवृत्तीचा असतो. स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, अन् दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहण्याचा अटोकाट प्रयत्न तो करत असतो.

बरं, असो. मुख्य पत्र लिहण्याचा विषय असा की बरेच दिवसांपासून तुमच्या दोघांतील ठिणग्या दिवाळीतील रॉकेटसारख्या आमच्या घरावर वारंवार आदळत आहेत. आज फारच असह्य झालं, म्हणून तुम्हां दोघांना समजवण्याचा लहान तोंडी मोठा घास घेत आहे. तरी सर्व बाजूंनी शांत डोकं ठेवून तुम्ही दोघांनी विचार करावा, अशी तुमच्या उज्ज्वल संसारीक हितासाठी आशा करतो.

प्रत्येक संसारी माणूस चालत आलेल्या श्रद्धेवर मनापासून विश्वास ठेवून असतो की, कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा मनासारखा जोडीदार मिळत नसतो. म्हणून तो मनाला आटोकाट समजवण्याचा प्रयत्न करतो की, लग्नगाठी ह्या भूतलावर नाही, तर स्वर्गात आधीच जुळलेल्या असतात. तरीसुद्धा नव्याचे नऊ दिवस संपले की, सहाजिकच थोड्याफार प्रमाणात लहानसहान कारणांमुळे काहीही देणंघेणं नसताना दोघांत संवाद कमी झाल्यामुळे किंवा गैरसमजूतीमुळे खटके उडायला लागतात.

सुरुवातीला दोघेही याकडे थोड्याफार प्रमाणात कानाडोळा करतात. परंतु, पाणी डोक्याच्या वर जायला लागलं की, दोन्ही बाजूंनी मनाला खुपतील असे शब्दप्रयोग जाणूनबुजून वापरण्याचा प्रकार अमलात आणला जातो. त्यामुळे दोघांतील विसंवाद सुरू होतो. कोणीही आपली पडकी बाजू घ्यायला तयार नसतो. शब्दाने शब्द वाढत जातो आणि त्याची कहाणी अख्ख्या गावभर पसरलेली असते, हे दोघांच्याही लक्षात येत नाही.

जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आपणच स्वतःहून तिसऱ्याला काही कामधंदा नसताना दोघांच्या मधे बोलण्याची संधी देतो. त्यामुळे भांडण मिटत नाही, उलट गावभर डांगोरा पिटला जातो. त्यात जर कोर्टासारखा चौथाच कोणी मध्यस्ती करू पहात असेल, तर भांडण न मिटण्याचा विचार केलेलाच बरा.

परंतु, लग्न करून सासरी सुखाने नांदणाऱ्या मुला-मुलींच्या आई-वडिलांनी हे समजून घेतलं पाहिजे. खरंच समजलं असतं, तर आज समाजात घटस्फोटासाठी दोन्हीही पक्षांकडून अरेरावी चालली नसती. या सर्व प्रक्रियेमुळे सर्वाधिक नुकसान मुलींचंच होत आहे, हे प्रत्येक समजदार पालकांनी समजून घ्यायला पाहिजे.

सर्वप्रथम आपल्या मुलीला किंवा मुलाला भविष्यकाळात येणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली पाहिजे. समाजातील इतर जोडप्यांचे घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे, मुलाबाळांचे हाल पाहिल्यानंतर प्रत्येक समजदार पालकाने दोन पावलं मागे सरकून विचार केला पाहिजे आणि घरातच तोडगा काढला पाहिजे. कोर्ट हे काही यावर उत्तर नाही. वकील हा व्यवसायिक प्राणी आहे. तो अशा संधीचं सोनं करायला मागेपुढे पाहत नाही.

तरी आतापासूनच प्रत्येक जोडप्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सावध राहावं. ह्या प्रसंगावर माझी एक कविता आहे.

“घटस्फोट”

घटस्फोट शब्द ऐकताच आम्ही दोघं घाबरून गेलो,
अन् ॲमेझॉनच्या मालकान घटस्फोट घेतला । १ ।

अमाप संपत्ती ज्यांच्यासाठी जमवीली,
ती सर्व त्यावेळी का नाही आठवली? । २ ।

कितीही कामे असली,
आपल्या माणसासाठी सवड नसली,
अन् ॲमेझॉनच्या मालकाची गाडी घटस्फोटाच्या ट्रॅफिकमध्ये फसली । ३ ।

संसारात अपेक्षा केवढी?
प्रेमाचे दोन शब्द तेवढे,
अन् ॲमेझॉनच्या मालकाला तेवढेच विसरले । ४ ।

प्रत्येक गोष्टीमध्ये तडजोड करता आली पाहिजे,
अन् ॲमेझॉनच्या मालकाला एवढं सुद्धा कळलं नाही पाहिजे । ५ ।

पैसा सांभाळणं सोपं असतं,
एकमेकांचं मन सांभाळणं कठीण असतं,
अन् ॲमेझॉनचा मालक असून सुद्धा हे प्रत्येकाला जमत नसतं । ६ ।

आयुष्यात पैसाच सर्व काही नसतो,
अन् ॲमेझॉनचा मालक असून सुद्धा फसतो । ७ ।

सात फेरे मारणं अन् सात वचन घेणं सोपं असतं,
अन् ॲमेझॉनचा मालक असून सुद्धा निभावणं कठीण असतं । ८ ।

समजा आपल्या दोघांच्या नात्याचं तुटणं एकदा कळू शकतं,
अन् ॲमेझॉनचा मालक असून सुद्धा मुलांना वार्यावर सोडणं बरं नसतं । ९ ।

म्हणतात सारे लग्नगाठी स्वर्गात जुळवतात,
अन् एका सहीनं त्या कशाला मोडता? । १० ।

आजकाल समाजात वाढत चाललेल्या कौटुंबिक विसंवादामुळे घटस्फोटाचे प्रमाणही वाढत आहे. कोर्ट हे काही त्यावरील उत्तर नाही, असे आम्हांला मनोमन वाटते. ही सामाजिक समस्या आहे, असे आम्ही मानतो, म्हणूनच समाजासाठी कवी या नात्याने आम्ही काही देणं लागतो. परपीडा पाहून मन स्वस्थ बसत नाही, म्हणून आमच्या परीने उद्बोधन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत राहणार आहोत, नव्हे, ते आमचे कर्तव्यच आहे, असे आम्ही समजतो.

आपला विश्वासू,
कवी नंदी
मो. 9767083604

 

Join WhatsApp

Join Now

1 thought on ““घटस्फोट” मानवी समाजातील कोण्या एका विसंवादी जोडप्यास अनावृत्त पञ…कवी नंदी!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!