मुंबई (बुलढाणा कव्हरेज न्यूज): गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांसंदर्भात राज्य सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील विविध विभागांतील रिक्त असलेल्या सुमारे ९६५८ जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यात चतुर्थ श्रेणीच्या पदांचाही समावेश आहे, ज्या सामान्यतः खासगी कंत्राटदारांमार्फत भरल्या जातात. मात्र, अनुकंपा तत्त्वावरील या जागा आता थेट सरकारकडून भरण्यात येणार असल्याने, प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांना न्याय मिळणार आहे. राज्याच्या इतिहासात अनुकंपा तत्त्वावर इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या निर्णयानुसार, या सर्व जागा १५ सप्टेंबरपर्यंत भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. यामुळे जवळपास १० हजार उमेदवारांच्या नोकरीच्या स्वप्नांना पंख फुटणार आहेत. अनुकंपा धोरण हे राज्यातील शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी एक महत्त्वाची तरतूद आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाले, तर त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला त्या विभागात नोकरी देण्याची व्यवस्था या धोरणात आहे. हे धोरण १९७३ पासून अमलात आहे आणि त्यात वेळोवेळी आवश्यक बदल करण्यात आले आहेत. मुख्यतः गट-क आणि गट-ड मधील पदांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.
या भरतीचा एकूण तपशील असा आहे: राज्यात एकूण ९६५८ जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी महानगरपालिकांमध्ये ५२२८ जागा, जिल्हा परिषदांमध्ये ३७०५ जागा आणि नगरपालिकांमध्ये ७२५ जागा आहेत. जिल्हानिहाय पाहता, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५०६ जागा आहेत, त्यानंतर पुणे जिल्ह्यात ३४८, गडचिरोलीत ३२२ आणि नागपूर जिल्ह्यात ३२० जागा आहेत. हा निर्णय घेण्यात आल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक आणि भावनिक आधार मिळेल, अशी अपेक्षा आहे.
1 thought on “महाराष्ट्रात अनुकंपा तत्वावरील 10 हजार जागा भरल्या जाणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!”