चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी स्वर्गीय गणेश श्रीराम थुट्टे आणि त्यांच्या पत्नीने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी व या शेतकरी कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी एक दिवसीय अन्नत्याग उपोषणाचा कार्यक्रम तहसील कार्यालय, चिखली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या उपोषणात परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी, गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ करण्यात आले आहे. या लढ्याच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत व न्याय मिळावा, अशी मागणीही होत आहे.
शेतकरी आत्महत्येचा प्रश्न हा समाज आणि व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेकडे बोट दाखवतो. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी एकजुटीने या लढ्यात सामील व्हावे, असेही आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांनी केले आहे.