चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील भरोसा गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, येथील पती-पत्नीने आपल्या शेतातच लिंबाच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार, दि. २४ जुलै २०२५ रोजी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान घडली.
मृतांमध्ये गणेश श्रीराम थुट्टे (वय ५५) व रंजना गणेश थुट्टे (वय ५०) यांचा समावेश आहे. दोघेही शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या नावावर भरोसा शिवारातील गट नं. ३१७ मध्ये सुमारे ५ एकर शेती असून, यंदा अल्प पावसामुळे सोयाबीन व कपाशी पिकांवर हुमणी अळीचा प्रचंड प्रकोप झाला होता. यामुळे पिके हातून जाण्याची शक्यता व कर्जाचा वाढता बोजा यामुळे त्यांनी नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच भरोसा येथील उद्धव थुट्टे यांनी अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
मृत दाम्पत्यास एक मुलगा, दोन मुली असून सर्वांची लग्न झालेली आहेत.
या प्रकरणी चुलत भाऊ एकनाथ प्रभाकर थुट्टे यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ दा. सोनकांबळे करीत आहेत.
या घटनेमुळे भरोसा गावात शोककळा पसरली असून, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांचे होणारे बळी ही गंभीर चिंतेची बाब ठरत आहे.
1 thought on “पती-पत्नीने गळफास लावून संपवले जीवन; कर्जबाजारीपणाचा शेतकरी कुटुंबावर दाहक परिणाम…”