बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातील वाद आता नव्या वळणावर आला आहे. मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर हा वाद उफाळला. या घटनेनंतर इम्तियाज जलील यांनी गायकवाड यांच्यावर टीका करताना, “मी त्या कर्मचाऱ्याच्या जागी असतो तर गायकवाडांना चांगली अद्दल घडवली असती,” असे विधान केले होते. यावर संजय गायकवाड यांनी थेट जलील यांना खुल्या लढाईचे आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, हे आव्हान त्यांनी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून करारनाम्याच्या स्वरूपात जलील यांना पाठवले आहे. हा करारनामा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.
या करारनाम्यात गायकवाड यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, जलील यांनी १९ जुलै २०२५ रोजी बुलढाणा येथील एका जाहीर सभेत “जगा भी तेरी, वक्त भी तेरा, और दिन भी तेरा” असे म्हणत गायकवाड यांना मारण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना गायकवाड यांनी हा करारनामा तयार केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “इम्तियाज जलील यांनी ठरवावे की लढाई कुठे, केव्हा आणि कोणत्या वेळी होणार. या लढाईत कोणीही धर्म किंवा पक्षाचा आधार घेणार नाही. तसेच, कोणतेही अस्त्र, शस्त्र, दगड-धोंडे किंवा अन्य साहित्य वापरले जाणार नाही. ही लढाई फक्त शारीरिक बळावर होईल आणि ती संबंधित जिल्ह्यातील पोलिसांच्या देखरेखीखाली पार पडेल.”
करारनाम्यात पुढे असेही नमूद आहे की, या लढाईत कोणताही तिसरा व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही आणि याची खबरदारी पोलीस घेतील. लढाईदरम्यान काही बरे-वाईट घडल्यास त्याची जबाबदारी फक्त गायकवाड आणि जलील यांचीच असेल. कोणतीही तक्रार संबंधित विभागाकडे केली जाणार नाही. हा करारनामा दोघांनीही पूर्ण होशात आणि कोणत्याही नशेच्या प्रभावाखाली नसताना केल्याचेही त्यात स्पष्ट केले आहे.
करारनाम्याच्या शेवटी गायकवाड यांनी एक टिप्पणी जोडली आहे, “अफजल खानाचा इतिहास सर्वांना माहित आहे. जर दगा-फटका करण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात ठेवा की मी शिवरायांचा मावळा आहे.” ही टिप्पणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायकवाड यांनी हा करारनामा मुंबईतील पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातही पाठवला आहे, जेणेकरून याची अधिकृत नोंद होईल.
हा वाद मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये ८ जुलै २०२५ रोजी घडलेल्या घटनेपासून सुरू झाला. गायकवाड यांना कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याचा आरोप करत त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका झाली. विरोधी पक्षांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र, गायकवाड यांनी आपली कृती योग्य ठरवताना म्हटले होते की, खराब अन्न परोसणे हे आरोग्याशी खेळ आहे. या प्रकरणानंतर जलील यांनी गायकवाड यांच्यावर टीका केली आणि त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला.
आता गायकवाड यांनी दिलेल्या या करारनाम्याला इम्तियाज जलील काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा करारनामा आणि त्यातील आक्रमक भाषा यामुळे बुलढाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे.
1 thought on “संजय गायकवाडांचे इम्तियाज जलील यांना थेट आव्हान: स्टॅम्प पेपरवर लिहून दिले ओपन चॅलेंज”