सुलतानपूर (सचिन खंडारे- बुलडाणा कव्हरेज न्युज): येथील आठवडी बाजारात मंगळवारी (१३ मे २०२५) रात्री किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बाजारातील गजबजलेल्या वातावरणात रात्री आठच्या सुमारास दोन व्यक्तींमध्ये धक्काबुक्की झाल्याने हा वाद उफाळला. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा असलेला हा वाद काही वेळातच मोठ्या भांडणात रूपांतरित झाला.
घटनेची माहिती मिळताच गावातील पोलिस चौकीतील बीट जमादार शिवानंद केदार, पोलीस हवालदार राजेश जाधव, सुनील नागरे आणि पोलीस कर्मचारी पांडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, वाद वाढत असल्याचे पाहून स्थानिक पोलिसांना पुढील कारवाईसाठी अतिरिक्त कुमक बोलवावी लागली.
मेहकर आणि लोणार येथून तातडीने अतिरिक्त पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि सैन्य दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावातील सर्व दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे बाजारातील गजबज शांत झाली आणि गावात तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली.
या घटनेची गांभीर्य ओळखून लोणारचे ठाणेदार निमीष मेहत्रे, बिबीचे ठाणेदार संदीप पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत दंगा नियंत्रण पथक आणि पोलीस फौजफाटा उपस्थित होता. पोलिसांनी गावकऱ्यांशी संवाद साधत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंशी चर्चा करण्यात आली, परंतु वाद पूर्णपणे मिटला नाही. अखेरीस, वादात सहभागी असलेल्या दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्रभर गावात गस्त ठेवली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गावकऱ्यांनीही शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे.
या घटनेमुळे आठवडी बाजारात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे परिस्थिती बिघडण्यापासून वाचली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. गावातील शांतता कायम राहावी यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे.
1 thought on “सुलतानपूर येथील आठवडी बाजारातील किरकोळ वादामुळे गावात तणाव; पोलिसांनी आणली परिस्थिती नियंत्रणात”